11/07/2025
खेळातल्या चुकणाऱ्या चालींपेक्षा गोंधळलेली मनं महत्त्वाची!
बुद्धिबळ शिकवताना लक्षात आलेली मुलांची भीती, गोंधळ, पालकांच्या अपेक्षा आणि संवादाचा अभाव – हे सगळं समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.
प्रिय पालकांनो,
माझ्या अकॅडमीमध्ये आम्ही केवळ बुद्धिबळ शिकवत नाही, तर वाढत्या वयातील मुलांचा मनोवैज्ञानिक विकास हाही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मुलांना शिकवण्याच्या अनुभवातून काही गोष्टी शेअर करू इच्छितो — आमच्याकडे काही खेळाडू येतात जे अजून एकाग्रतेत, शिस्तीत किंवा संवादात स्थिर नाहीत. प्रशिक्षक म्हणून आमचं काम फक्त चाली शिकवणं नाही, तर त्या मुलांचं मानसिक व बौद्धिक बळही वाढवणं आहे — पण हे काम शंभर टक्के फक्त अकॅडमीमध्ये शक्य नाही. यासाठी घरातूनही मदतीची गरज असते. हे प्रत्यक्षात ५०/५० भागीदारीचं नातं असायला हवं. कारण रोज प्रशिक्षण देतांना जाणवतं की, शिकवणं फक्त कोचिंग क्लासपुरतं मर्यादित नसतं; ते घर, मन, आणि मुलांच्या अतिशय गुंतागुंतीच्या अनुभवांशी जोडलेलं असतं. हा लेख मी प्रशिक्षक म्हणून आलेल्या अनुभवांतून आणि पालकांशी संवादातून मांडतोय ज्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला समजून घेता येईल.
कधी एखादं मूल बिनधास्तपणे, आत्मविश्वासाने चाल खेळते तर काही मुलं अशी असतात, की त्यांना चाल खेळण्याआधीच स्वतःवरचा विश्वास ढवळून टाकणारा असतो. त्यांची चाल चुकते आणि ते थरथरतं - हातापायांनी नाही, तर मनाने....
मुलं चुकतात, विसरतात, कधी म्हणतात, "मला जमणार नाही." पण त्याच वेळी एखादा खेळाडू १० वेळा तीच चूक करूनही हसत राहतो. ह्याचं कारण केवळ बुद्धिमत्ता नसते, ह्याचं मूळ त्या मुलाच्या मानसिकतेत, त्याला मिळालेल्या वातावरणात, आणि त्याच्यावर असलेल्या अपेक्षांमध्ये असतं.
कधी कधी एखादं मूल सतत चुळबुळ करतं, चिडचिड करतं, लक्ष देत नाही, फोकस करत नाही, किंवा सर सांगत असलेलं ऐकतही नाही. आपल्याला वाटतं, "हा मुलगा शिकेल की नाही?" मी एक प्रशिक्षक म्हणून सांगतो – प्रत्येक मूल शिकू शकतं. "मुलं शिकताना अडखळतात का?" हो, आणि ते स्वाभाविक आहे! मुलं शिकताना अडखळतात कारण त्यांचा मेंदू अजून विशिष्ट पातळीवर परिपक्व झालेला नसतो. सततचा स्क्रीन टाइम त्यांचं लक्ष वेधून घेतो. घरातील तणाव, शाळेचा अभ्यास, स्पर्धेचा दबाव – हे सर्व खेळातही परिणाम करतात. त्यांना चुका करायची भीती वाटते, म्हणून ते पुढे सरसावतच नाहीत. आपण जेव्हा त्यांच्या अडखळण्याला "नालायकपणा" समजतो, तेव्हा आपण त्यांच्या स्वतःच्या मनाशी सुरू असलेल्या संघर्षाला दुर्लक्षित करतो. आज मुलांची मानसिक घडण अधिक संवेदनशील आहे.
काही मुले खूप गोंधळ करतात तर काही मुले खूपच शांत असतात. आपण अनेक वेळा म्हणतो, “माझं मूल शांत आहे” – आणि हो, संयम असणं हे नक्कीच गुण आहे. पण कायमच शांत राहणं हे लक्षण असू शकतं की त्या मुलामध्ये काही भावना दडल्या जात आहेत? असा मला कधी कधी प्रश्न पडतो कारण मुलं बोलत नाहीत, पण त्यांचं अंतर्मन बोलत असतं. खेळतांना त्यांनी केलेल्या चुका, त्या चुकांवर त्यांची प्रतिक्रिया, किंवा त्यांचा खेळातील आत्मविश्वास हे त्याचे संकेत असतात. म्हणूनच मी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघतो की मुलं बोलतायत ना!!... मला असं वाटतं की मुलांचा खेळ सुधारवणं हे तर महत्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं काय असेल तर मुलांच्या मनाचा विश्वास मिळवणं. हो की नाही? एवढं करूनही मुलांच्या अश्या वागण्यातले बदलांमागे काही वैज्ञानिक करणे देखील असू शकतील असे मला सतत वाटत राहते. जसे मेंदूच्या एका विशिष्ट भागाचा विकास अजून पूर्ण न झालेला असतो, झोप कमी असते, आहार असंतुलित असतो, सतत स्क्रीन टाईममुळे मेंदूला धीम्या शिकवणीचा कंटाळा येतो, भीती, अपयश, घरातील ताण यामुळे मूल अडथळा निर्माण करतं आणि कधी कधी त्यांना ‘चुकू नये’ याची इतकी भीती असते, की त्यातूनच लक्षच जातं. म्हणून ह्या टप्प्यात आल्यावर मला जाणवते कि आता पालकांशी संवाद करायला हवा.
बरं माझ्या अकॅडमीत येणाऱ्या पालकांशी संवाद साधतांना एक गोष्ट लक्षात येते ती ही की पालक म्हणतात, “अरे सर क्या बताएं परेशान करके रखा हैं घर पे, कही अटका रहें इसलिए चेस लगा रहें हैं” पालक म्हणून पालकांची चिंता ही रास्त असते पण मुलं अशी वागतात किंवा ते तसे असतात ह्यामागे खोल कारणं असू शकतात. सततचा मोबाईल वापर, फास्ट मनोरंजनामुळे मेंदूला धीम्या शिकवणुकीत रस वाटत नाही. (ह्याबाबतीत brain rot असा शब्द सध्या प्रचलित होत आहे)
घरातील तणाव, भांडणं ह्यामुळे त्या मुलाला/मुलीला असुरक्षित वाटतं आणि शिकणं ही त्यांच्यासाठी दुय्यम बाब बनते. मागील वयातील अनुभव – अपयश, अपमान, शारीरिक शिक्षा, भीती यांचे खोल परिणाम मुलांच्या बालमनावर होत असतात, अति अपेक्षा – “तू इतरांपेक्षा कमी का खेळतोस?” असं वारंवार ऐकल्याने मूल भीतीत वावरतं. शिकताना प्रेमाऐवजी फक्त शिस्तीचा वापर, अश्याने आत्मविश्वास हरवतो
शाळेतील वातावरणही विचारात घ्यायला हवं, स्पर्धा, टार्गेट, निकाल, तुलनात्मक अपेक्षा — हे सर्व शाळांमध्ये सर्रास चालू असतं. त्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या खेळावर आणि भावनिक संतुलनावर होतो. शाळेतील स्पर्धा, तुलना, अभ्यासाचा भार हे सुद्धा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात.
त्यावरही पालक, शिक्षक, आणि कोच मिळून चर्चा करणं आणि सोपा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. बुद्धिबळासारख्या खेळांमुळे मुलांचं मन अधिक खोल आणि स्थिर होतं. पण त्या स्थैर्याला धोका पोहोचतो जेव्हा:शाळेत सतत तुलना केली जाते, घरी सतत अपेक्षा लादल्या जातात आणि मुलांना त्यांचं मन मोकळं करण्याची संधी दिली जात नाही.
म्हणूनच या विषयावर शाळा, घर आणि कोच यांचं एकत्र काम करणं – ही काळाची गरज आहे. पालकांनी दररोज थोडा वेळ नुसता “असणं” मुलांसोबत घालवावा. कोणती चूक झाली, किती गुण मिळाले यापेक्षा – "काय वाटलं?" "काय नवीन केलं?" असा संवाद महत्त्वाचा आहे.
पालक आणि प्रशिक्षक हे मुलाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे आधारस्तंभ. या दोघांमध्ये संवाद असेल, आदर असेल आणि एकमेकांची मर्यादा समजून घेणं असेल, तर मुलं त्या आधारावर नक्कीच उभी राहतील.
“मी शिकवतो, तुम्ही पैसे देता” एवढाच संबंध असेल तर तो तोट्याचा आहे. “मी प्रशिक्षण देतो, आणि त्याला तुम्ही साथ देता” – हेच नातं मुलांचं भविष्य घडवू शकतं.
मग यासाठी पालक काय करू शकतात? घरात मुलांशी प्रेमाने संवाद करा. “सर ओरडतात का?” याऐवजी “सर काय शिकवत होते?” असं विचारा. अर्धा तास मोबाईल-फ्री वेळ ठरवा, ज्यात तुम्ही मुलासोबत शांतपणे वेळ घालवाल. अकॅडमीतील सूचनांकडे सहकार्याने बघा.
एखादा प्रशिक्षक पालकांना काही सांगतो, तेव्हा तो दोष देत नाही, तर मार्गदर्शन करत असतो.
वर्तनावर रागावण्याऐवजी विचार करा – हे असं का घडतंय? कदाचित मूल तुमचं लक्ष वेधतंय! पालकांनीही वेळ काढून मनोविज्ञान विषयक वाचन करावं, मुलांशी दररोज शांत संवाद ठेवावा. "तू खेळ जिंकलास का?" याऐवजी, "तुला काय नव्याने शिकायला मिळालं?" असं विचारावं. मुलं मोबाईलवर काय बघतात, यापेक्षा पालक काय वाचतात, काय बोलतात, आणि कसे संवाद साधतात, हे अधिक महत्त्वाचं आहे. रोजच्या धावपळीत १५ मिनिटंही तुम्ही मुलांसोबत 'मोबाईलविना' घालवलेत, तर ते त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठं बक्षीस ठरतं.
मनोज चेस अकॅडमीत आम्ही प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देतो (प्रयत्न तर तोच आहे). एकाच गोष्टीसाठी अनेक पद्धती वापरून शिकवायचा प्रयत्न असतो. समजून घेणं आणि समजावणं यामधली जागा जपतो. बुद्धिबळाचा मानसिक, भावनिक निर्णयांशी ह्याचा थेट संबध येते असल्यामुळे बाल मानसोपचार तज्ञांचं सल्लाही घेतो, जेणेकरून प्रत्येक मुलाचं वर्तन ‘का’ असं आहे, आणि त्यासाठी कोच म्हणून मी काय करू शकतो? वागण्यात, शिकवण्यात, अकॅडमीच्या एकूणच वातावरणात काय बदल करू शकतो, हे नीट समजू शकेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एक प्रशिक्षक, पालक आणि शाळा एकत्र आले, संवाद साधला, थोडा वेळ दिला — तर हे लहानसे खेळाडू पटावरच नाही तर आयुष्यातही मजबूत चाल खेळू लागतील.
आम्ही मनापासून प्रयत्न करतो, पण मी काही व्यावसायिक बालमानसशास्रज्ञ नाही म्हणून कधी कधी संवाद चुकतो (मिसकम्युनिकेशन), किंवा भावना नीट पोहोचत नाहीत (मिसअंडरस्टँडिंग) – त्यावेळी तुम्ही आम्हाला सुसंवादाने ते कळवलंत, तर आम्हालाही सुधारायला मदत होईल. बुद्धिबळात राजा एकटाच खेळत नाही, त्याचं रक्षण करणारे अनेक घटक असतात — तसंच एक मूल घडवताना, पालक, शिक्षक, प्रशिक्षक, सामाजिक वातावरण हे सर्वच घटक आवश्यक आहेत. तुम्ही आम्हाला वेळेवर काही गोष्टी सांगितल्या, किंवा आमच्या सूचना ऐकल्या, तर आम्ही अधिक नेमकं मार्गदर्शन करू शकतो.
शेवटी...
प्रत्येक मूल शिकू शकतं. पण त्याचं शिकणं हे पटावर चालणाऱ्या सोंगट्यांइतकं सोपं नसतं. ते मनाच्या खोल गुंतागुंतीतून येतं. त्या गुंत्यात प्रशिक्षक हात देतो, पण पालकांनीही मन द्यावं लागतं. शिकवणं ही टीमवर्क आहे – आणि त्या टीमचा भाग मी अभिमानाने आहे.
आपला मनोज सर,
मनोज चेस अकॅडमी, शिरपूर
मोबाईल: 098228 28143