10/06/2026
गरजू सर्वसामान्यांची पडताळणी करूनच घरकुले देण्याची
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची सूचना
निपाणी : गरजू सर्वसामान्यांची पडताळणी करूनच घरकुले देण्याची सूचना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केली आहे. आज बुधवार दिनांक 10 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना करताना घरकुल वाटप पारदर्शक व्हावे आणि ते योग्य लाभार्थ्यांना मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दिनांक 20 मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता ड्राॅ पद्धतीने घरकुल वाटप करण्याचा घातलेला घाट आम्ही सर्व सामान्यांचे हित जोपासून हाणून पाडला. मुळातच आश्रय समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे या समितीचा अध्यक्ष सुद्धा अस्तित्वात नसल्याने सध्या जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून या समितीवर काम पाहत आहेत. आम्ही मागणी केल्यानुसार प्रशासनाने 1012 लाभार्थ्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती (सर्व्हे) घेण्याचे काम सुरू आहे.
दि. 12 जून पर्यंत हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सध्या या घरकुल लाभार्थ्यांच्या सर्व्हेदरम्यान डोळ्यात तेल घालून काम करावे. आपल्या शेजारी असलेल्या लाभार्थी जरी गडगंज असला तरी त्याची तक्रार करावी. जेणेकरून पैसे भरलेल्या मूळ लाभार्थ्यालाच हक्काचे घर मिळावे, असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
चिंगळे म्हणाले, दि. 20 मे रोजी झालेला घरकुल वितरण गोंधळाबाबत अनेक लाभार्थ्यांमध्ये गैरसमज पसरला आहे. मात्र आम्ही कोणाचेही घर हिसकावून घेतले नाही. मुळात घरे किती तयार आहेत? हा प्रश्न असला तरी ज्यांनी पैसे भरले आहेत अशा सर्वांनाच ड्रॉ मध्ये समावेश करून घ्यावे अशी आग्रही मागणी आमची होती. पहिल्या टप्प्यात 600 जणांची यादी ड्रॉमध्ये ठेवण्यात आली. मात्र आम्ही विरोध केल्याने पुन्हा 200 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला मात्र यामध्ये पैसे भरलेले लाभार्थी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सुधारित यादी जाहीर केली जाईल मगच वितरण होईल असे जाहीर केले. त्यानंतर आपण सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी,खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळेच प्रशासनाने यादी पडताळणीचे काम चालवले यामध्ये लाभार्थ्यांकडून पैसे भरलेले पावती घेऊन सुधारित यादी तयार करून ही फलकावर प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांनाच घरे मिळावीत यामध्ये 4 हप्ते भरलेल्या या सर्वांचा समावेश असावा अशी मागणी आमची होती. ज्येष्ठतेप्रमाणे लाभार्थ्यांची नावे असावीत अशी कुठलीही बाब नमूद नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी घर मिळाल्यानंतर 10 दिवसापर्यंत आपापल्या मर्जीनुसार ग्रुप करून त्यांना वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. असे असताना विद्यमान आमदार व माजी खासदारांनी हा गोंधळ घडवून आणला. दिनांक 1 जुनपुर्वी पैसे भरलेल्या सर्वांचीच बँक पावती मागून प्रशासनाने सध्या यादी प्रसिद्ध करून सर्व्हे चालविला आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून लाभार्थ्यांची योग्य ती चौकशी होणार आहे.खरोखरच जे लाभार्थी नाहीत अशांना यातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 12 पर्यंत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांच्या वर लक्ष ठेवावे तरच हे काम सोपे होणार आहे चुकीच्या पद्धतीने कोणालाही या योजनेचा लाभ मिळू नये ही आमची भूमिका आहे.
सध्या प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार घरकुल वाटपात पारदर्शकता असावी अशी आमची आग्रही भूमिका आहे त्यामुळे विनाविलंब तपास पथके कार्यरत करून अंतिम यादी तयार केली आहे त्यामुळे निश्चितच या घरकुलाचा लाभ मिळणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निपाणी ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील, वैभव पाटील, किरण कोकरे, प्रवीण हेगडे, विश्वास पाटील,ॲड. प्रदीप पाटील, अब्बास फरास, विनोद बळळारी, फारूक गवंडी, अस्लम शिकलगार, दिपक ढणाल, संजय सांगावकर, जरारखान पठाण, जयश्री लाखे, मंगल घोरपडे, बबन चौगुले, कल्पना पुजारी, रेश्मा चिपळूणकर, स्नेहल माने, सलमा शेख यांच्यासह काॅंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
----