24/08/2026
प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत शिरढोणच्या श्रीकृष्ण संघाचे पटकावले अंतिम विजेतेपद....
अकलूज : प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज वतीने मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील मराठमोळ्या व रांगड्या आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत शिरढोण (ता. पंढरपूर) येथील श्रीकृष्ण-अ संघाने धायटी (ता. सांगोला) येथील बिटू माने संघाचा अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपदाचा मान पटकाविला. विजेत्या संघास मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. श्री. दीपकराव खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. महादेव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे सहसचिव मा. श्री. हर्षवर्धन खराडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदान पूजनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील या पारंपरिक खेळाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर २८, माळशिरस २५, सांगोला ७, माढा ६, मंगळवेढा १ आणि इंदापूर १, अशा ६८ नामवंत संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या सामन्यांचा थरार रात्री तब्बल २.३० वाजेपर्यंत सुरू होता.
अंतिम सामन्यात श्रीकृष्ण-अ, शिरढोण आणि बिटू माने, धायटी या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. अखेर श्रीकृष्ण-अ, शिरढोण संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ-
* प्रथम क्रमांक – श्रीकृष्ण-अ, शिरढोण (पंढरपूर) – रु. ४४,००० व आकर्षक चषक
* द्वितीय क्रमांक – बिटू माने, धायटी (सांगोला) – रु. ३३,०००
* तृतीय क्रमांक – डोनाई डोनमळा, पळशी (पंढरपूर) – रु. २२,०००
* चतुर्थ क्रमांक – सद्गुरू भवानीगिरी, शिरभावी-अ (सांगोला) – रु. ११,०००
उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या बालाजी मित्र मंडळ, गादेगाव (पंढरपूर), श्रीराम पेहे (पंढरपूर), जय हनुमान तांदुळवाडी (माळशिरस) आणि काशिलिंग धायटी (सांगोला) या चार संघांना प्रत्येकी रु. ५,००० चे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे समालोचन बापूसाहेब लोकरे यांनी केले. सूत्रसंचालनाची धुरा इलाही बागवान, अनंत कोळी, किरण सूर्यवंशी आणि राजकुमार पाटील यांनी सांभाळली.
मुख्य पंच म्हणून बंडूकाका ताठे-देशमुख, पंडित नाना ताठे-देशमुख, आबासाहेब ताठे-देशमुख, विक्रम मिसाळ, उद्धव केंगार, बाळासाहेब सरवदे आणि लालासाहेब बाबर यांनी काम पाहिले. तसेच ६८ फाटी पंचांनी स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेस मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण,संचालक, आजी-माजी खेळाडू, सहभागी संघांचे खेळाडू तसेच आट्यापाट्याच्या थराराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मंडळाच्या संपूर्ण संयोजन समितीने अहोरात्र परिश्रम घेतल्याने स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडल्या.