19/04/2018
गन्ने का रस
◆◆◆◆◆◆◆
एप्रिल महिन्याच्या त्या रणरणत्या उन्हात ,रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते .उन्हाच्या झळा अंगावर येत होत्या ,मधुनच वावटळीचा धूराळा उठला की शरीर आणि कपडे पूर्ण धुळीने माखून जात होते . रामशरण आणि तिलकधारी मात्र नेटाने हातगाडीवर उसाचे भारे ओढत चालले होते .वन विभागाच्या कार्यालयापाशी त्यांना जायचे होते. ती जागा गावापासून जरा दूरच होती .कार्यालयाभोवती चिचबिलाई ,भोकर ,सिसम ,सागवान ,चिंच अशी उंच आणि डेरेदार सावली देणारी झाडे होती .त्यामुळे तो परीसर शांत आणि रमणीय वाटायचा .
चिंचेच्या मोठ्या झाडाच्या सावलीत त्यांनी हातगाडी थांबवली .रस्त्याच्या एका बाजूला वन विभाग आणि पलीकडे शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ! जरा मोकळी ,स्वच्छ जागा पाहून त्यांनी सगळा ऊस खाली उतरवला आणि एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवला.रिकामी गाडी घेऊन तिलकधारी निघून गेला. रामशरण घामाने निथळला होता .डोक्यावरचे पागोटे उशाला घेऊन तो जरा आडवा झाला आणि काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली.
रस्त्याच्या पलीकडून दहा भिरभरते , छोटे छोटे डोळे ,ऊस आणि झोपलेला रामशरण यांच्याकडे पाहात होते . झाडाखाली हातगाडी थांबल्यापासून रामशरण झोपेपर्यंत ,सगळ्या हालचाली त्यांनी टिपल्या होत्या. आठ दहा वर्षांची ती पाच मुलं होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणालाही घरात डांबलेलं आवडायचे नाही. मित्र जमले की पत्ते, क्यारम,लूडो,व्यापार असे बैठे खेळ घरात खेळायचे.आरडाओरडा, हसणं खिदळणं,भांडणं नाही झाली तर ती मुलं कसली ! त्या दिवशी सत्ती लावणीचा खेळ सुरू होता ,तीन डाव झाले होते आणि तिन्ही वेळा चंदू सुटला होता. चौथ्या डावात संजू चिडला आणि डाव उधळून बाहेर पडला.त्याच्या पाठोपाठ सुधीर ही उठला. घराच्या आडोशाला गाडी ठेवायला एक झोपडी होती ,त्या सावलीत दोघे उभे राहिले. म्होरक्या उठून गेल्यावर बाकी चिल्ली पिल्ली काय करतील ? सगळे च झोपडीत लपून बघू लागले .रामशरणची ऊसाची गाडी संजूच्या नजरेत भरली होती. हिरवाकंच रसरशीत उसाकडे सगळे लोभस नजरेने पाहू लागले .
"संज्या ,ऊस आणायचा का " सुधीरने विचारले.
"आणू या ,पण हे पोट्टे बोंबलतील ना "
इतर मुलांकडे हात दाखवत संजू बोलला.
" नाही नाही ,आम्ही नाही सांगणार " असं सगळी मुलं एका सुरात म्हणाली . "चल सुध्या " असं म्हणत संजूने सुधीर चा हात धरला आणि हळूहळू चालत दोघे रस्त्याच्या पलीकडे ऊसापर्यंत पोचले. रामशरण अजूनही घोरत पडला होता ,ऊसाचा मोठा ढीग बाजूलाच पडला होता. संजूने आजूबाजूला पाहिले आणि सुधीरला खूण करून एक ऊस झटकन उचलला आणि पळत झोपडीच्या मागे पोचला. पाठोपाठ सुधीरही पोचला .त्या अचाट साहसाने दोघांनाही घाम फुटला होता. थोडा दम घेत संजूने आपल्या एका पायावर उभं राहात गुडघ्यावर ऊस आपटून तोडण्याचा प्रयत्न केला सिनेमात दाखवतात तसं , पण तोल जाऊन तोच पडला ,तशी इतर मुलं फिदीफिदी हसली . "अबे ,फाटऱ्यांनो ,तोडून दाखवा पयले ,दात दाखवून राह्यले " खाली बसल्याबसल्याच रागावून तो बोलला.
लागूनच राजाचं घर होतं " मी विळी घेऊन येतो " असं तो म्हणाला.
"नको ,तू समोरून आत जा आणि मागचं दार उघड ,अंगणात बसून आपण ऊस खाऊ ,इथे सगळ्यांना दिसतं ."
"पण एकदा घरात आल्यावर आई बाहेर जाऊ देणार नाही." राजा बोलला .
" अबे हळूच जा ,काकू झोपल्या आहेत. मी मघाशी समोरच्या दाराला बाहेरून कडी लावली होती " असं विन्याने सांगितले. 'हो ' अशी मान हलवत राजा हळूच घरात शिरला.बाकी सगळी मुलं मागच्या दारापाशी ,हातात ऊस घेऊन बजरंगबली च्या थाटात ! दरवाजा उघडला तर समोर चंद्रभागा मोलकरीण ! "सॉरी ,सॉरी " असं म्हणंत संजू भागेच्या हाताखालून आत घूसला आणि पाठोपाठ सगळी गँग ! भागाबाई डोळे मोठे करून पाहू लागली , तसं भागाबाईला विश्वासात घ्यावंच लागेल ,हे संजूने ओळखले.तोंडावर तर्जनी ठेवून "श् श् s s " बोलायचं नाही अशी खूण केली . " भागाबाई ,ऊस बघा किती छान आहे ,तीन तीन तुकडे करा ,एकेक आम्हाला द्या आणि एक तुम्ही घ्या " असं म्हणंत दोन्ही ऊस तिच्या हातात दिले .भागाबाई खूश झाली .आता विळीने काप की सुरीने , ते तिचे काम होते .मुलं आता दबक्या आवाजात बोलू लागली.
"अबे ,त्या गाडीवाल्याच्या लक्षात आलं तर बे '' विन्या बोलला.
"अबे एवढ्या मोठ्या ढिगाऱ्याहतून दोन ऊस गेले तर काय फरक पडतो बे त्याला ?भागाबाई ,विन्याचा ऊस तुम्हीच घ्यावा "
"नाही बे ,मी असंच म्हंटलं "
ऊसाचे पाच तुकडे, प्रत्येक मुलाला एक असे वाटले गेले आणि एक थोरला तुकडा भागाबाईने स्वतः साठी ठेवला.विळी पाण्याने धुऊन जागेवर ठेऊन ती मुलांकडे पाहात बसली.सगळी चमू ऊस खाण्यात मग्न होती. पण असा पूर्ण ऊस खाणं आंबा,पेरू खाण्याएवढं सोपं नाही हे दिसुनच आलं.उसाचे साल दातांत धरून सोलणं जमत नव्हते, लहानग्या तोंडात ऊसाचे कांडे जात नव्हते .धारधार सालीने ओठ कापले ,पण जसा जमेल तसा ऊस खाणं सुरु होतं.रसाचे ओघळ हातावर आणि गालावर नक्षीकाम करून गेले. चिकट हात पुसण्याचे पहिले साधन म्हणजे चड्डी आणि शर्ट ! कपड्यांना रस चिकटला होता ,त्यावरच धूळ आणि ऊसाचा चोथा ! थोडक्यात, आई बाबांच्या हातून मार खाण्याची पूर्ण तयारी झाली होती. अंगणात सगळीकडे ऊसाचे कांडे विखुरले होते.खाल्लेल्या ऊसाचा चोथा मध्येच थुंकल्यामुळे पायाला लागत होता. चिकट पायाने राजा दोनवेळा घरात मीठ आणायला गेला होता. बिनानिमंत्रणाच्या माशा जमल्या होत्या .एकंदरीत राजाचं काही खरं दिसत नव्हतं.
"काकू उठल्या का बे राजा " असं संजूने विचारलं तोच ,"राजाss"अशी हाक मारंत काकूच बाहेर आल्या. अंगणातील विविध मनोरंजक वस्तूंचे प्रदर्शन पाहून पहिला रट्टा राजाच्या पाठीवर बसला.. तोपर्यंत बाकी मुले पसार झाली होती...
संध्याकाळी उन्ह उतरल्यावर ,कपडे बदलून आणि आपापल्या आयांचे मार खाऊन सगळी वानरसेना रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर एका रांगेत शिस्तिने बसली होती .तिथून थोड्याच अंतरावर ऊसाचा रस काढत यंत्राजवळ रामशरण उभा होता. सुधीर आणि संजू बाजुबाजूलाच चिकटून बसले होते आणि हळू आवाजात एकमेकांशी बोलंत होते. दोघांनाही 'ऊस प्रकरण' भारी पडलं होतं ,बहुधा डबल धमाका आई आणि बाबांकडूनही ! रामशरणचे ऊस पिळून रस काढणं सुरू होतं.अचानक संजू उठून रामशरणकडे गेला. त्याला असा जातांना पाहून सगळ्यांना भिती वाटली.संजू त्याच्याशी 'भैय्या भैय्या' म्हणत हिंदीतून बोलत होता आणि रामशरण शांतपणे हसऱ्या चेहेऱ्याने ऊस पिळत रस काढंत होता.एका खिशातून पैशाची नोट आणि दुसऱ्या खिशातून साबणाचा तुकडा संजूने रामशरणच्या हातात कोंबल्याचं सगळ्यांना दिसलं.परत आल्यावर आता त्यांच्या गाण्याचा खेळ सुरु झाला .पुन्हा हसणं खिदळणं, हमरीतुमरी ,रुसणं सुरु झालं .अचानक विन्याचे बाबा तिथे येऊन उभे राहिले ,तसे सगळे चूप झाले. हातातील कागदाचा तुकडा नाचवत ,ते मोठ्याने विचारंत होते "ही खेळातील पाच रुपयांची नकली नोट रसवाल्याला कोणी दिली ? "
राजीवलोचन
१२एप्रिल २०१८
© R.S.Pundlik