24/01/2019
मोदी, फडणवीस पाच वर्षाचा हिशोब जनतेला द्या
- अमित विलासराव देशमुख यांनी डागली तोफ
सुशिक्षीत बेकारांना दरवर्षी दोन कोटी नोकरी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ, उदयोगाची उभारणी, रोजगारनिर्मीती, महिला सक्षमीकरण,अशी जुमलेबाजी करीत गेली पाच वर्ष देशातील जनतेची पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातील जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली. नुसते श्रीफळ वाढविण्याचे काम या सरकारनी केले. भृष्टाचाराने संपूर्ण देश पोखरून टाकला. ज्या योजना यशस्वी होवू शकत नाहीत, अशा योजनावर हजारो कोटींचा खर्च करून देशातील जनतेवर कर्जाचा डोगर उभा करण्याचे पाप केले. खोटी आश्वासने देणाऱ्या पंतप्रधन नरेद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आता पाच वर्षाचा हिशोब जनतेला द्यावा अशी तोफ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव माजी राज्य्मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर तोफ डागली.
एन.एस.यु.आय. लातूरतर्फे येथील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या विदयार्थी सुविधा केंद्राचे उदघाटन बुधवारी सांयकाळी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हसते झाले. त्याप्रसंगी विराट सभेत आमदार देशमुख बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. विक्रम हिप्परकर, यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.व्यकंट बेद्रे, एनएसयुआयचे मराठवाडा निरीक्षक सचिन संत्रे, मनपातील विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सुळ, नगरसेवक पप्पू देशमुख, आयुब मनियार, योजना कामेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. या परिवर्तनानंतरच जनसामान्यांचे प्रश्न सुटतील, असे नमुद करुन आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टीमुळेच लारतूरमध्ये उदयोग, व्यापार, शिक्षणाचे जाळे, रस्ते, रेल्वे, विमातळ उभे राहिले. रोजगार निर्मिती झाली. आज महाराष्ट्रात जे रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहेत ते तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि तात्कालीन उदयोगमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळेच. गेल्या पाच वर्षात अमुलाग्र बदल घडला, असे काहींही झालेले नाही. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाची कोणाची मागणी होती. मागणी नसताना या समृध्दी महामार्गावर ५५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय? गावाला जायला निट रस्ता नसताना समृध्दी महामार्ग कशाला हवा? नागपूरमध्ये मेट्रोची गरज आहे काय? मेट्रोचे भूमिपूजन करण्यासाठी नागपूरमधील १२ किलो मीटरचा नवा उड्डान पुल जमीनदोस्त करुन शेकडो कोटी पाण्यात घातले. नागपूरची मेट्रो यशस्वी होईल काय? असा प्रश्न आहे. मुंबईतील बुलेट ट्रेनला प्रचंड विरोध असताना एक लाख कोटींचे कर्ज कशासाठी?, असे प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणता उद्योग उभा केला.
एकही कारखाना उभा राहिला नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले नाही. केवळ जनतेच्या भावनेशी खेळण्याचे उद्योग सरकारने केले आहे, असा आरोप करुन आमदार देशमुख पुढे म्हणाले की, आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा खोटी आश्वासने जनतेच्या भेटीला येणार आहेत. त्यापासून दूर रहा. भाजपाचा भ्रष्ट कारभार उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा. जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. त्यामुळे आता देशातील चित्र बदलत चालले आहे. देशभर बदल घडत आहेत. महाराष्ट्रातही बदल घडणार. देशाला नवा पंतप्रधान आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आणि सामान्य माणसाला न्याय मिळणार. लातूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचा उत्तम उमेदावार असेल. राहूल गांधी देशातील सामान्यांसाठी एकटे लढा देत आहेत. सामान्यांनी राहूल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ॲड व्यंकट बेद्रे एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी मनोगत केले.ॲड. विक्रम हिप्परकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी विजयकुमार साबदे, एकनाथ पाटील, सुनिल नावाडे, शिवाजी कांबळे, डॉ. शिवाजी जवळगेकर, रोहित पाटील, प्रणाली कांबळे, सुरज पवार, ओम माने, सागर मेठे, अक्षय एकुर्गे, सत्यप्रकाश आंबेडकर, कमल सोमवंशी, व्यंकटेश पूरी, तानाजी कदम, कन्हैया बिरकले, निखील लाकरे, महेश कांबळे, समीर काझी, सूदर्शन राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद सोळंके यांनी केले.
#जिथे कंत्राटदार तिथे पैसा
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा नाही. परंतू नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ५५ हजार कोटी आहेत. जिथे कंत्राटदार तिथे पैसे ही भाजपाची निती आहे. भाजपाचया प्राथमिकता वेगळया आहेत, असे आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
#उजनीच्या पाण्याचे काय झाले ?
लातूर दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकला आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी लातरूला येऊन लातूरला उजणीचे पाणी देण्याची घोषणा दोन वर्षापुर्वी केली होती. उजणीचे पाणी लातूरला अदयाप मिळाले नाही. उजणीच्या पाण्याचे झाले काय? असा प्रश्न आमदार देशमुख यांनी यावेळी उपसिथत केला.
#राष्ट्रध्वज उभारणीचा खर्च जनतेसमोर सादर करा
राष्ट्रध्वज ही आमचीही अस्मिता आहे. लातूर शहरात राष्ट्रध्वज उभारला गेला त्याचा आम्हालाही अभिमान आहे. परंतु आमच्या अस्मितेच्या आड काळेबेरे होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठवाडयात सर्वांत उंच राष्ट्रध्वज औरंगाबाद येथे आहे असे असतांना सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारल्याचे खेाटे सांगत लातूरकरांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार झाला. विशेष म्हणजे ध्वज उभारणीसाठी ७५ लाख रूपये खर्च झाला हे जनतेसमोर सादर करा, असे आवाहन आमदार देशमुख यांनी योवळी केले.