04/05/2025
पाण्यात दगड फेकल्यावर पाण्याची वलय निर्माण होतात आणि पाण्यातच विरून जातात .बोदवड माझे माहेर .बोदवडची आठवण झाली की मनात आठवणीची असंख्य वलय निर्माण होतात .बोदवड हे नाव कसे प्रचलित झाले ?याविषयी एक व्युत्पत्ती सांगितली जाते .गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले .या बोधिवृक्षाची एक शाखा त्यांनी बोदवडला लावली .बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला म्हणून या जागेचे नाव बोधिवड असे ठेवण्यात आले. बोधीवडचे बोधवड आणि बोधवडचे बोदवड असे रूप नंतर प्रचलित झाले .
बोदवडला असताना ज्या व्यक्ती माझ्या जीवनात आल्या त्यांच्या जीवनानुभवाचा मला जो फायदा झाला त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्या आठवणीच्या पहिल्या वलयात डोकावून पाहताना माझ्या आईची गोरीपान, नाकीडोळी नीटस ,सुंदर मूर्ती दिसू लागते.माझ्या आईचं बालपण खूप श्रीमंतीत गेलं. तिच्या वडिलांच्या घरी भरपूर शेती होती .दूध दुभत्या म्हशी कायम असत. आईला आजही दूध दही खायला आवडतं. तिची त्वचा खूप कोमल आणि चमकदार आहे .माझी एक ब्युटीशियन मैत्रीण आईला पाहून म्हणाली होती "मावशी तुम्ही खूप सुंदर दिसता !"आई लाजून म्हणाली "आता म्हातारपणी कसलं सुंदर नी काय".
माहेरी असताना आईने हरिणीचे पाडस पाळले होते. त्याच्याबरोबर ती खेळत असे आणि बाटलीने त्याला दूध पाजत असे .त्याकाळी मनोरंजनाची फारशी साधने नसल्यामुळे बुधवारच्या बाजारात जाऊन फेरफटका मारणे , डोंबारी व गारोडीचे खेळ पहात उभे राहणे हा तिचा छंद होता .आईचा हा बालसुलभ स्वभाव आजही कायम आहे. एखादी मिरवणूक जात असली की आई आवर्जून बघायला जाते .तिचं बालपण असं सुखात गेलं. लग्नानंतर तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण तिने तक्रार केली नाही
तिचा स्वभाव शांत आहे. समाधानी राहणं तिला आवडतं .सगळ्यांशी जुळवून घेणं तिला जमतं. म्हणून इतरांना गर्विष्ठ वाटणारी माणसेही तिच्याशी बोलतात .
अद्वैत तत्त्वज्ञान रोजच्या जगण्यातून आईने आम्हाला शिकवले .भारतीय तत्त्वज्ञानात अद्वैताचा अर्थ "देव एक आहे " असा आहे .साने गुरुजी अद्वैताचा वेगळा अर्थ सांगतात "तू आणि मी दोन नाही एक आहोत."शारीरिक इजा केली की मला वेदना होते तशी तुलाही होते म्हणून दुसऱ्याच्या वेदना जाणून घ्यायला हव्या. हाच अर्थ आईने आम्हाला शिकवला. प्रसंग असा घडला होता. लहानपणी चिमण्यांना घरात कोंडून आम्ही चादरी खाली पकडत असू .त्या पळून पळून थकल्या की आम्हाला खूप आनंद होई .एक दिवस आम्ही चिमण्यांना छळत असताना आई स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि म्हणाली "का त्रास देता त्यांना ?तुम्हाला कोणी अशा वेदना दिल्या तर तुम्हाला किती दुःख होईल? त्या दिवसापासून चिमण्यांना त्रास देणे आम्ही बंद केले.
उन्हाळ्यात चुलीवर स्वयंपाक करताना आईच्या कपाळावर घामाच्या धारा लागत. आम्ही मात्र गरम गरम पोळ्यांचा स्वाद घेत असू .सर्वांचे जेवण झाल्यावर आई जेवत असे .तिच्यासाठी भाजी शिल्लक आहे की नाही याची काळजी वडील घेत." तुम्ही सर्वांनी जेवले की माझे पोट भरते "असे आई म्हणायची .भाजी संपली म्हणजे भाजी चांगली झाली होती असा विचार करून तिला समाधान वाटत असे.
शिस्तीच्या बाबतीत ती कठोर होती. ओट्यावर खाट टाकून त्यावर ती बसे .मला पायाजवळ बसवी .उत्तर चुकले की फटकन पट्टीने मारी. रडू आले तरी रडू देत नसे.मग हुंदके देत उत्तरे द्यावी लागत.
उन्हाळ्याची सुट्टी होती .तिने आम्हाला काही काम सांगितले की आम्ही दोघी बहिणी" जा मी नाही करणार "!असे उत्तर देत होतो .तिने एका दिवशी झाडूने चांगला मार दिला .दुसऱ्या दिवसापासून सगळी कामे आम्ही विना तक्रार करू लागलो. पण कॉलेजचा अभ्यास करताना आईने घरकामे करायला लावली नाही. जेव्हा मुलींकडून फक्त घर कामाची अपेक्षा केली जात होती तेव्हा तिने आम्हाला अभ्यास करू दिला .तिच्यामुळेच आम्हाला शिक्षणाचा उपयोग झाला.
आईने कृतज्ञता भाव शिकवला .कोणी आपल्याला मदत केली तर त्याचे स्मरण ठेवून आपणही मदत करावी असे ती शिकवत असे.
एकदा मीआजीच्या घरची वाटी घेऊन आले. आईच्या ते लक्षात आले. मला ती रागवली. आजीची वाटी देऊन ये असे म्हणाली. या प्रसंगाने कोणाची वस्तू घेऊ नये हे मनावर पक्के बिंबले .आईने असे छोट्या छोट्या प्रसंगातून संस्कार केले. तिने केलेले संस्कार म्हणजे अभिषेक पात्रातून ठिबकणारे थेंब !
आईला निरामय आरोग्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना